रत्नागिरी : शहरात मुख्य मार्गावर तीन ठिकाणी वर्दळीमुळे अपघातांची जास्त शक्यता असल्याने तिथे स्पीडब्रेकर व्हावेत, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पादचारी व वाहनचालक नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही गोष्ट आवश्यक असल्याने तत्काळ व्हावी, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्मी ,भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनाही निवेदन दिले आहे.
प्रविण देसाई यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी शहराला जोडणारा मुख्य रस्ता साळवी स्टॉपपासून सुरू होता. या प्रमुख मार्गावर ३ जास्त वर्दळीची ठिकाणे आहेत, जिथे वाहनांची तसेच पादचाऱ्यांची रस्ता पार करण्यासाठी जास्त गर्दी होत असते. शिवाजीनगर उतार, शिवाजीनगर येथे हिंद सायकल मार्टसमोर व आरोग्य मंदिर या ठिकाणी जास्त प्रमाणात रस्ता ओलांडताना अपघात होतात. या ठिकाणी शाळेतील मुले, ज्येष्ठ नागरिक यांची वर्दळ जास्त प्रमाणात असते. प्रविण देसाई यांनी सांगितले की, ही बाब गेल्या वर्षीही प्रशासनाला निदर्शनास आणून दिली होती. तरीही यावर आजतगायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. नागरिकांची सुरक्षितता हे प्रशासनाचे प्राधान्य असले पाहिजे. तरी वरील बाबींचा विचार करून रंबलर स्ट्रीप किंवा स्पीडब्रेकर जे काही प्रशासनाच्या तांत्रिक दृष्ट्या योग्य असेल ती कार्यवाही करावी.
*दखल न्यूज महाराष्ट्र*