ही लढाई मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी नव्हे तर विकसित भारताच्या गंगौघात रत्नागिरी-सिंधुदुर्गला नेण्याची. – अतुल काळसेकर.
‘अब की बार ४०० पार’ हा केवळ नारा नाही तर विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या दिशेने उचलेले एक पाऊल आहे. – बाळ माने.
कोकणाच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी, कोकणी माणसाच्या समृद्धतेसाठी भाजपाचा खासदार संसदेत निवडून जाणे अनिवार्य – प्रमोद जठार.
‘यही समय हैं, सही समय हैं|’ – राजेश सावंत.
रत्नागिरी | रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आज रविवार, दि. ३ मार्च रोजी रत्नागिरी (द.) जिल्ह्यातील बूथस्तरीय कार्यकर्त्यांचे महासंमेलन संपन्न झाले. यावेळी भाजपा नेते, गोव्याचे मुख्यमंत्री ना. डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, “प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष व शेवटी स्वतः हे ब्रीद घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या भाजपाला सत्तेसाठी नव्हे तर जनसेवेसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा लढवायची यासाठी असून मित्रपक्ष व त्यांचे नेते अत्यंत सुज्ञपणे सहकार्य करतील असा आम्हाला विश्वास आहे. राज्यात महायुतीचे नेते व केंद्रातील भाजपा नेते याबाबत सकारात्मक निर्णय घेतीलच पण मी स्वतः या जागी भाजपाचा उमेदवार असावा अशी आग्रही भूमिका मांडेन.”
“ही निवडणूक एक युद्ध असणार असून आपण मागील २ वर्षांपासून सातत्याने यासाठी घाम गाळत आहोत. कोण्या एका नेत्याला पंतप्रधान करण्यासाठी नव्हे तर राष्ट्राला समृद्ध करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. मोदीजींच्या नेतृत्त्वात विकासाचा गंगौघ देशभर प्रवाहित होत असताना त्यापासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग वंचित राहू नयेत हीच आपली भावना असल्याने आपण याठिकाणी भाजपाला संधी मिळावी याबाबत प्रयत्नशील आहोत.” असे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर यांनी सांगितले. लोकसभा सह-प्रभारी बाळ माने म्हणाले, “मा. मोदीजींचे नेतृत्व जगाने मान्य केले असून भाजपा कार्यकर्त्यांनी अलीकडेच ‘मोदी सरकारची ९ वर्षे’, ‘गांव चलो’ अभियान उत्तमपणे राबवून लोकांमध्ये रत्नागिरीच्या उज्ज्वल भवितव्याविषयी आशावाद यशस्वीपणे निर्माण केला आहे. त्यामुळे ‘अब की बार ४०० पार’ हा केवळ नारा नाही तर विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या दिशेने उचलेले एक पाऊल आहे.”
लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मागील ५ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या सेवाकार्याची माहिती देत ठाकरे सरकारच्या काळात कोकणावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. तसेच विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कोकणाला काहीच मिळाले नसल्याबाबत खंत व्यक्त केली. “रोजगार नाही, पर्यटनाला चालना नाही, पायाभूत सुविधाही उपलब्ध नाहीत अशात निसर्गाच्या स्वैरपणामुळे बागायतदारांना त्रास होत असून कोकणी माणूस अजूनच खोल जात असल्याने कोकणाच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी, कोकणी माणसाच्या समृद्धतेसाठी भाजपाचा खासदार संसदेत निवडून जाणे अनिवार्य आहे.” असे मत मांडले.
रत्नागिरी (द.) चे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत म्हणाले, “भाजपा रत्नागिरी (द.) चे कार्यकर्ते सेवाकार्यात अग्रेसर आहेत. आमचे पालक, महाराष्ट्राचे मा. सा. बां. मंत्री ना. रविंद्र चव्हाण साहेब वेळोवेळी आवश्यक असेल ती मदत अत्यंत तत्परतेने करतात. मात्र तरीही अनेक कार्यकर्त्यांच्या क्षमतांवर मर्यादा येत असल्याने भाजपाला रत्नागिरीत अंत्योदयाचे अपेक्षित लक्ष्य गाठण्यात यश प्राप्त होत नाही. अशात मित्रपक्षांच्या सहकार्याने आम्ही भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आग्रहाने मागत असू तर निश्चितपणे विजयाची ग्वाही देतो. यावेळी आमच्यासोबत ‘मोदी की गॅरंटी’ असून लोकांचा विश्वास आहे की ‘मोदीजींची गॅरंटी म्हणजे गॅरंटीपूर्ण होण्याची गॅरंटी’ त्यामुळे ‘यही समय हैं, सही समय हैं|’ वरिष्ठ पातळीवर योग्य निर्णय घेतला जाईल याबाबत आम्ही आशादायी आहोत.” दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतील चिपळूण, रत्नागिरी व राजापूर विधानसभांची तयारी किती झाली आहे याची माहिती डॉ. प्रमोद सावंत यांनी सकाळी विवा हॉटेलमध्ये झालेल्या प्रबंधन समितीच्या बैठकीत घेतली होती. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली तत्पूर्वी महिला मोर्चा रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी यांनी आभारप्रदर्शन केले. बैठकीसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.